Text

All posts/experiences/articles has been written and published by मनस्वी राजन( Rajan / Rajendra). Kindly leave your feedback and encourage me to write more and more.
Request you to do not copy and Paste this write-up for any use. All write-up (articles) has been protected by Copy Rights Act.
Do write your honest comment.

Yours,
RaJaN

Sunday, August 28, 2011

दंश


उतरणीवरुन सुर्य गेल्यानंतर रात्रीने सगळ्यांच्या जगाचा ताबा घेतला पण उद्या होणारी सकाळ नक्की काय घेउन येईल ह्याचा मागमूस कोणालाही नव्हता.
झोपेच्या अंधा-या कुशीमधे तर स्वप्नांना सुध्दा बंदी होती. निर्जीव यंत्राप्रमाणे दिवसभर हात-पाय चालत होते, रक्ताचा रंग बदलत होता आणि पाण्याप्रमाणे शरीरातून निघत होता. शरीरातील एकएक तंतु गुप्त होउन काही घटकांच्या मरणयात्रेवर गेला होता. जो जीवन जगतो त्याला स्वप्न, इथे तर धड जगणं सुध्दा नव्हते. आयुष्य नावाच्या एका भेसुर आणि दुर्दैवी जन्माच्या यात्रेचा गाडा ओढायाचं काम सगळेच करत होते. दिवस येतो तो फक्त कष्टासाठी आणि मावळतो तो फक्त मरण्यासाठी. त्या अस्वस्थेतच एक जीव किनकिनत होता. निद्रा नामक तात्पुरत्या मृत्यूशय्येवर सगळे जीव निर्जीव झाले होते. मात्र त्या जीवावर लक्ष होते ते फक्त अंधाराचं. तो चाचपडत उठला आणि जोराने टाहो केला, "आयेऽऽऽऽऽ... लै पोटात दुखतयं.."

त्या सपराच्या घरातून बराच वेळ डण्याचा आवाज येत होता. तो आवाज सुध्दा त्या दिर्घ रात्रीच्या अंधाराने  गिळून टाकला. सं झालं तरी काय. कुणाला काहीच माहीत नव्हतं. अंधाराचा गडदपणा हळूळू कमी होत गेला, सं चित्र स्प्ष्ट दिसू लागलं. सपरांच्या घराची मोठी चाळच होती. रानात काम करणा-या गड्यांच्या संसाराची वस्ती.

ज्वारीच्या वाळक्या कडब्याच्या आणि ऊसाच्या पाचोळ्याचे झाप बनवून भिंती तयार केलेल्या. अश्या झोपड्यांची मोठी चाळच इंदलकरानी बांधली होती. "खोपाट " म्हणायचे सगळे ह्या झोपडी सारख्या घराला. इंदलकराच्या मळ्यात हे सगळे सालाने काम करणारे आणि त्यांच्या बायका त्याच मळ्यात रोजंदारी करणा-या. सा-या वस्तीला जाग आली होती पण परश्याच खोपाट ऊघडलं नव्हतं. गंजलेल्या पत्र्याचा टेकु लावला होता. तो पत्रा म्हणजेच त्या खोपटाचा दरवाजा. बायका विहीरीवरुन हंड्याने पाणी भरत होत्या. कोणीतरी परश्याच्या दारात ठेचकळली तेंव्हा तिच्या नजरेत खोपटाच बंद दरवाजा आला. तिथेच लागलेल्या ठेसेचा राग त्या बंद घरावर काढला आणि बरोबरच्या बाईला म्हणाली, "यस्वा मेली. इंदलकराच्या मुकादमाबरोबर पाठ लावती आणि नवरा खातुया भाड."
दण्-दण पाय आपटत त्या दोघी दारातून निघून गेल्या.

त्या वस्तीतल्या नानाच्या ही गोष्ट लक्षात आली. नाना वस्तीवरचा वयस्कर माणू. एकटाच रहायचा. त्याने खोपटाच्या दारातून परश्याला आवाज द्यायला सुरवात केली,
  " परश्या.. ओ राज.. तुम्ही तर लका आक्रितच करतया गड्या हो. समदी निघाली तरी तुमचा उठायचा पत्ता नाय. दोघं नवरा-बायकु काय खोपडी पिऊन झोपली का काय". नानाने दारात वाट बघितली. तंबाखू  काढली आणि तिथचं मळतभा राहिला. तून काहीच हालचाल नाय म्हणल्यावर चुण्याच्या डबीने दार वाजवायला सुरवात केली. आतमधुन कसलाच आवाज येत नव्हता. नाना थोडा तला. दोन-चार गडी त्या खोपटाच्या दारात बोलावले. त्यातला एकजण बोलायला  लागला,
 "रं काय वो हे? परश्या दारुसाठी मुकादमाची पाठ सोडत नाय अन त्याच्या बायकुची मुकादम पाठ सोडत नाय. जुन ह्यांच्या आयला ऊठायचा तपास नाय. ऊस काढायचाय आज अन हा भाड्या झोपुन राह्यलाय".
त्यांच्यातलाच त्तम नावाचा सालदार,"वं ती बाई मुकादमाला करल मुका आणि परश्याला करल मुकादम आपल्या ऊरावर बसवायला. ह्याच्या आयला काढा बाहीर त्याला. गडी यायचा शीरा तवर आपुण रकायच्या काय त्याच्या सरी".

सगळेजण दार वाजवत होते. शेवटी खोपटाच्या दाराला जोराचा धक्का दिला. खोपटाचे दार उघडले. खोपटाच्या आतुन एखादी वीज वेगाने दारावर येऊन सर्वांच्या अंगावर धडकावी आणि त्याच वेगात सगळेजण हादरुन दरवाज्यापासून उलट्या पायाने आणि विजेच्या वेगाने मागे फिरले. एखादी कोणाला न ऐकु आलेली किंकाळी सगळ्यांचे कान सुन्न करुन गेली आणि सगळ्यांच्या नजरा सुध्दा बधीर झाल्या. परश्याच्या खोपटामधे एक बारीक हालचाल झाली; आणि मागे फिरलेले पाय पुन्हा खोपटाकडे त्या निर्जीव वातावरणात चालू लागले. जी बारीक हालचाल झाली ती अर्जुनाची. अर्जुन परश्याच्या एकमेव मुलगा. परश्या आणि त्याची बायको खोपटामधे हात-पाय वाकडे करुन पडले होते. बाभळीच्या लाकडासारखे कडक झालेले हातपाय आणि अस्ताव्यस्त झालेली त्यांच्या अंगावरची फाटकी वस्त्रे वस्तुस्थितीची जाणीव करुन देत होती. दोघांचाही जीव मरणयात्रेवर गेला होता. दोघांचाही मृत्यू झाला होता.

अर्जुन त्यांच्या बाजुलाच त्या ताडपत्रीवर पडला होता. एक पाय हवेत उचलायचा प्रयत्न करत होता. पोट दाबत होता. तोंडातून फेस वजा थुंकी बाहेर काढत होता. अर्जुनाला जिवंत पाहून सगळ्यांनी लगबग केली आणि खोपटात घुसले. वस्तीतल्या नानाने पटकन खाली बसून अर्जुनाचा पाय उचलून त्याचा तळवा चोळायला सुरवात केली. त्याच वेळी खोपटाच्या कोप-यातुन सळ-सळ असा दिर्घ आवाज झाला. त्या आवाजाकडे सगळ्यांच लक्ष वेधले गेले. नानाने अर्जुनाचा पाय हातून तसाच सोडून दिला आणि तो तसाच उभा राहिला. दोन काळेकुट्ट साप खोपटाच्या पाचोळ्यातून बाहेर जात होते. एक अंदाजे तीन्-चार फुटाचा असेल आणि एक त्याच जातीचा साधारण दिड फुटाचा होता. आवाजाची सळ-सळ ज्या वेगात आली त्याच वेगाने दोन्ही साप पाचोळ्यातून बाहेर गेले. ती सळ-सळ आणि सापांनी वेगात जाण्यासाठी सरपटताना केलेली वळ-वळ सगळ्यांच्याच अंगावर काटा आणून गेली. भितीने सगळ्यांचे घशे कोरडे पडले, घश्यातच आवंढे घेत सगळेजण उभे राहिले आणि पटकन अर्जुनाला उचलून खोपटाच्या बाहेर आणले.

पटकन कुणीतरी जाऊन तांब्यामधे पाणी आणले. अर्जुनाच्या तोंडात थेंब-थेंब पाणी सोडलं आणि नाना त्याला विचारु लागला.
"आर्जुना काय रं झालं ?".
अर्जुन," लैऽऽऽऽ  पोटात दुखतया नानाऽऽ, पायबी लय दुखतोयाऽऽऽ. आग पडलीयाऽऽऽऽ पोटात.."
अर्जुना त्याला जमेल तेवढ्या मोठ्या आवाजत विव्हळण्याचा प्रयत्न करीत होता. अर्जुना कन्हत होता.
"आई बा ला काय झालयं रं तुझ्या ",नाना.
अर्जुन, "लै हातपाय झाडत होती दोघं, मग पार शांत झाले, मलाबी काय तरी चावलय पायाला. लै चुन-चुनतयाऽऽऽऽ. ओ नानाऽऽऽऽ  बघाना  वोऽऽऽ".
नाना,"आरंऽऽऽऽ , भो**च्या होऽऽगर्दी करुन हुभ राह्यलया. आत खोपटात बघा की काय हालचाल हाय का?"

दोघे-तिघे घाईने खोपटात गेले, परश्याचे आणि त्याच्या बायकोचे हातपाय कसेबसे सरळ केले. तिथल्याच एका पोत्याचे सुत काढुन परश्याच्या नाका समोर धरलं;
तसंच सुत परश्याच्या बायकोच्या नाकासमोर धरलं; कसलीही हालचाल नाही म्हंटल्यावर दोन बायकांनी टाहो फोडला. सा-या बायका, बापे, लहान मुले, वस्तीवर बांधलेली गुरे, दारात फिरणा-या कोंबड्या आणि एकूणच सा-या मळ्याच्या नजरेने खोपटाचा वेध घेतला. सकाळचा मळ्यावरच्या वस्तीवर फिरणारा प्रसन्न वारा आज मात्र वातावरणाला चांगलाच झोंबला होता. मळ्यावरची वस्ती परश्याच्या खोपटापुढे जमा झाली. दोघांची प्रेते लोकांनी खोपटाच्या दारात ठेवली. वस्तीतल्या बायकांनी त्या दोघांचा ताबा घेतला आणि अक्षरश: मोठ्या आवाजात रडगाणं चालू केले. सगळ्या पुरषांनी तिथेच गराडा घातला आणि दोन पायावर बसले. कोणी तंबाखु काढली, कुणी बीड्या पेटवल्या, कुणी बळेच डोळे पुसायला सुरवात केली. तर कुणी आपल्याच पायाच्या अंगठ्यानी जमीन टोकरत परश्याच्या बायकोच्या गळ्यातल्या गंठणाचं काय करायच असा विचार करत खाली मान घालुन बसले. तिथूनच काही पावलं अंतरावर नाना अर्जुनाच पाय चोळत बसला होता. हा सगळा प्रकार बघुन नानाने ओरडायला सुरवात केली.

"आरं तुमच्या आयला होऽऽऽऽ, थोबाड घीऊन बसलायसा, डॉक काय वढ्याला गेलय व्हय ईरड करायला"
सगळेजण जागेवरुनच मान मागे करुन नानाकडे बघायला लागले. नानाचा पारा आता वाढला होता. अर्जुनाची नजर जड होत होती. तो अस्पष्ट आवाजात कण्हत होता.
नाना," आरंऽऽऽऽ,इंदलकराला बोलवा, मुकादमाला सांगा, त्यांच्या ताब्यात मढी द्या आणि पहीलं अर्जुनाकडं बघा. पोरात जीव हाये. वाचवायला पायजे, उठा लौकर, हाला बिगीबिगी"
तसे दोन गडी उठले आणि इंदलकरांच्या वाड्यावर जायला निघाले. बायका परश्याच्या खोपटात गेल्या आणि आतमधुन दोन फाटके रग आणले. काही माणसांनी त्या फाटक्या रगानी परश्याचे आणि त्याच्या बायकोचे प्रेत झाकले . सगळेजण नानाकडे धावले. सगळ्यांनी नानाकडे बघून न बोलता एक प्रश्न एकसाथ विचारला होता.

तो म्हणजे, "आता काय करायचं? परश्याचं काय करायचं?"
नाना, "मला काय अर्जुनाचं खरं वाटाना गड्यांनो, पोराचा पाय काळा पडलाय. कीडुक चावलय पायाला. कायतरी करायला पायजे. अर्जुना वाचायला पायजे".
भिका नावाचा सालदार हळुच नानाला म्हणाला, "नाना खरं तर बोलणं बरं नाय पण कुणीतरी बोलायलाच पाह्यजे. अर्जुन जरी वाचला तरी बी त्याला संभाळायचा कसा. आपल्याला रोज हाता-तोंडाची गाठ पाडायला रगात पडपर्यंत काम कराया लागतया. त्यात आजुन एक त्वांड घरात ठिवायचं म्हनजी पोटावर आणि कपाळावर बी पाय ठीवल्यासारखं झालय".
त्याच बोलण तोडतच उत्तम सालदार बोलायला लागला, "व्हय नाना बराबर हाये भिकाच,आणि पोरगबी मोठ नाय. पाच-सात वर्षाच असल. मोठ आसतं तर ज्याच्या घरात राहील त्याच्याकडनं मळ्यात सालदार गड्याच आपल्यावाणी गुरासारख काम केल असत. ज्याच्या घरात हाये त्याला चार पैक तरी भ्यटल असत. पण तस बी नाय ना वो. म्या तर म्हणतो त्यो मुकादम यायच्या आत परश्याच्या बायकुच्या गळ्यातला गंठण काढुन घ्या. आता सगळ शेवटचं करायचयं धाव्या दिसापर्यंत. आपुन कुठुन आणायचा पैका. त्या मुकादमाचा असाबी परश्याच्या बायलीवर डोळा व्हता. त्यो भाड्या आल्या-आल्या तीच्या गळ्याला हात घालल गंठण काढायला".

सगळ्यांनी एका स्वरात "व्हय व्हय" म्हणायला सुरवात केली. पटकन एक बाई उठली आणि परश्याच्या बायकोची मान उचलुन तिच्या गळ्यातील चार मन्यांचा गंठण काढुन घेतला, आपल्याच साडीच्या पदरात बांधुन ठेवला आणि आपल्या जागेवर जाउन बसली. नाना अर्जुनाच्या केसातुन हात फिरवायला लागला. अर्जुनाच डोळे मिटले होते. त्याच्या बंद ओठातुन त्याचा हुंकार ऎकु येत होता. त्या इवल्याश्या पोराच्या नाकावर आणि ओठावर माश्या बसत होत्या पण अर्जुनाकडे तेवढे त्राण नव्हते की त्या माश्या तो हटकुन लावेल. नाना अर्जुनाचा तोंडावरुन हात फिरवताना माश्या हटकु लागला. त्याच्या निळ्या रंगाच्या सद-याची बटण तुटली होती, त्याच शर्टाने त्याच्या तोंडातुन येणारी लाळ नाना पुसत होता. अर्धमेला जीव नानाच्या मांडीवर डोके ठेऊन आपल्या जगण्याची लढाई लढत होता. कायमच दारिद्र्या नशीबी असल्याने अर्जुनाच्या अंगात चड्डीचा पत्ता नव्हताच. कोणाचा तरी मागुन आणलेला अंगापेक्षा मोठा सदरा त्याच शरीर झाकायच काम करत होता.

अर्धमेल्या अर्जुनाकडे बघत नाना चेतुन ऊठला," आरं द्वाडा होऽऽऽऽ, माणसाच्या जीवापरीस पैश्याचं मोठपण आलय तुम्हाला. म्या संभाळतु अर्जुनाला. तस बी म्या एकलाच भिकार, आसु द्या माझ्या जोडीला".
भिका, "आरं नाना, जमनार हाये का तुझ्यानी? तुझच वय झालया आता".
नाना,"मग काय जीव घ्यायचा का पोराचा. आर माणस हात का राकीस?"
सगळेजण शांत झाले होते. कोणी मान वर करुन बोलायला तयार नव्हते.
नाना,"कसला इचार करताय बांडगुळा हो. जावा पटदीशी आप्पा मांत्रिकाला बोलवा गावातुन. साप, ईचु त्यो उतरावतो म्हणत्यात".
उत्तम,"आवं पण अजुन इंदलकर नाय आलं. मुकादम बी न्हाय".
नाना, "आरं मालक आन मुकादम आल्यान काय अर्जुना उठुन बसणारे व्हय".
सगळ्यांना नानाचे बोलणे पटले. पटकन सायकल काढुन एक सालदार आप्पा मांत्रिकाला आणायला गेला आणि नाना अर्जुनाच्या तोंडावरच्या माश्या हटकत राहीला.

अतिशय मळलेले पंचासारखे नेसलेले धोतर, पांढ-या रंगाची कोपरी. दंडाला लाल-भगव्या रंगाचे धागे बांधलेले. गळ्यात कवड्यांच्या आणि रुद्राक्षाची माळ. काळ्या दो-यात बांधलेल्या छोट्या-छोट्या पेट्या गळ्यामधे लटकत होत्या. खुरटी दाढी आणि ओठ-तोंड पान-सुपारीमुळे पुर्ण लाल. डोक्यावर तेलकट गांधी टोपी आणि कपाळावर गुलाल आणि बुक्क्याच्या पट्ट्या. वय थोडं जास्त झाल्याने कमरेत झुकुन झपझप चालत हातात पिशवी आणि गाडगं घेऊन आप्पा मांत्रिक आला. अर्जुनाकडे न जाता सरळ त्याच्या
आई-बापाकडे  गेला. त्यांच्या अंगावरचे रग ऊचलुन कुठे-कुठे काय बघत होता ते कोणालाही कळाल नाही आणि पटकन अर्जुनाकडे आला, त्याचे पाय नीट बघत आपल्या घोग-या आवाजात बोलायला सुरवात केली,"आर...आर..! गड्या हो. हे काय साध सुध दिसत नाय. वेगळच जनवार दिसतया".
नाना, "आप्पा महाराज,किडूकच होत. आम्ही सगळ्यांनी बघीतलया".
आप्पा,"व्हय रं बाबा. सापच हाये पण ह्यो बांधावरचा दिसतुया. चुकलया काय तरी. सा-या घरादारावर ऊठलया."
नाना आश्च्यर्याने," बांधावरचा म्हंणजी? म्हसुबाचा म्हणताय काय?"
आप्पा,"व्हय म्हसोबा. बांधावरचा म्हसोबा. काय तरी द्वाड केलया त्याला तुम्ही".

आप्पानी अर्जुनाला ऊचलले आणि ’उगवती-मावळती’ कडे पाय आणि डोके केले. पिशवीतुन अंगारा काढला. अर्जुनाच्या कपाळाला लावला. नाकापुढे धरला.अर्जुनाचा श्वास चालु होता. गाडग्यात हात घातला आणि तोंडातली तोंडात मंत्र म्हणायला लागला आणि जोरात ओरडला "यस देर भैरवनाथाऽऽऽऽ".
गाडग्यातल पाणी एका हातात घेतल. अर्जुनाच्या ओठावर त्या पाण्याचे थेंब पाडले. आपल्या एका हाताने अर्जुनाचे तोंड जबरदस्तीने उघडुन हातातले पाणी तोंडात सोडले. ओला हात अर्जुनाच्या तळव्याला आणि पायाला काहीतरी पुटपुटत चोळला. आपल्या दंडाचा एक लाल दोरा काढला आणि पिशवीमधून एक छोटी तांब्याची डबी बाहेर काढली. डबीमधून सापाची कात काढली आणि त्या लाल दो-यामधे बांधली. तो लाल दोरा अर्जुनाच्या ज्या पायाला साप चावला होता त्या पायाच्या मांडीला आवळुन बांधला, आप्पा मोठ्याने बोलु लागला," म्हसोबाचा आणि भैरवनाथाचा निवद करा. आंड, चिलीम, भात, गुळ, त्याल,शेंगदाणं घेउन या". असं म्हणत आप्पाने एका पुडीतुन कुंकु हातावर घेतले.
अर्जुनाला कुंकु लावलं. चारही बाजुला फुंकलं आणि अर्जुनासमोर डोळे मिटुन काहीतरी पुटपूट्त बसला.नाना आणि दोन-चार बायका खोपटांमधे गेले. आप्पा मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे सगळा नैवेद्य गोळा करुन आणला. सगळेजण अर्जुनाकडे आणि आप्पाकडे टक लावून बसले होते पण दोघांच्या मुद्रेमधे काहीच फरक नव्हता. फरक होता तो फक्त म्हणजे अर्जुन हळुहळु काळसर होत चालला होता. काही वेळाने आप्पाने डोळे उघडले आणि अर्जुनाकडे बघितले. पुन्हा पहिल्याप्रमाणे पाणी पाजले. अर्जुनाच्या प्रतिक्रियेची वाट बघत बसला आणि घाई करायला लागला, "गड्या हो! चला लवकर. निघा. कोणत्या बांधावर म्हसोबा हाय तिथं चला. ह्या पोराला बी घ्या".
सगळ्यांमधला एकजण म्हणाला, "मागच्या हाप्त्यात धाकल्या मळ्यात परश्यान नांगर चालवला तवा त्यानी बांधावर नांगर घातला आणि म्हसुबाला मातीखाली गाडला. तव्हाच म्या त्याला म्हणल व्हतं. बांधावरचा देव हाय. कोपल. पण खोपडीच्या नशेत गड्याने थट्टा केली".
नाना," चला बीगीबीगी धाकल्या मळ्यात. पोराला ठेऊ तिथं. घाराण ऐकतुच की देव."

अर्जुनाला नानाने पाठीवर घेतले होते. त्याच्या जोडीला आप्पा मांत्रिक चालत होता आणि त्यांच्या मागे सगळी वस्ती चालत होती. सगळ्या बायका वस्तीवरच थांबल्या. तेवढ्यात इंदलकराला आणि मुकादमाला बोलवायला गेलेले गडी सगळ्यांच्यात सामिल झाले आणि म्हणाले, "मालक त्याच्या बारक्या पोराला घेऊन कुठतरी गेल्यात. मुकादम म्हणाला व्हा पुढ. आलुच".
सगळी वस्ती धाकल्या मळ्याची ढेकळ तुडवत आणि ठेचकळत चालत बांधावर पोहचले. जाणकरांनी म्हसोबाची जागा शोधली. ढेकळांखालून म्हसोबाची शेंदुर लावलेले दगड बाहेर काढले. पाणी टाकल. चिलीम ठेवली. तंबाखु भरली. अंड ठेवल. तेलाच दिवा लावला. भात ठेवला आणि त्याच्या समोर अर्जुनाला झोपवले. नानाने म्हसोबाला लोटांगन घातले आणि म्हणाला, "म्हसोबाच्या नावान चांगभलऽऽऽऽ. चुकलं-माकलं पदरात घ्या देवाऽऽऽऽ. बारक्या जिवाला सोडा. पोराच्या नावानं कोंबड चढवतो पण आई-बापाच पाप पोराच्या टाळूवर नका मारु देवा. येत्या आमुश्याला कोंबड लावतो देवा"
थोडावेळ लोटांगण ठेऊन नाना ऊठला आणि आप्पाने सुध्दा नानासारखीच देवाची प्रार्थना केली. सा-या वस्तींच्या पुरुषांनी पाया पडायला सुरुवात केली. तिथेच सगळे बांधावर अर्जुनाकडे बघत बसले. आता मात्र वेळ बराच झाला होता. सकाळच ऊन चांगलच तापायला लागलं होत. सगळ्यांच्या कपाळातुन घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या पण नजरा मात्र अर्जुनावर खिळल्या होत्या. अर्जुनाची हालचाल कमी झालि होती आणि तापत्या ऊन्हामुळे मानेला झटके द्यायला अर्जुनाने सुरुवात केली होती. आप्पा ऊठला आणि बोलु लागला,"गड्या हो! देवाच्या मनात काय हाये कळत नाय. पोराला भैरोबाच्या गाभा-यात सोडु. शेवटाला सा-या गावाचा, देवाचा आणि राना-मळ्याचा राजा त्योच्च".

नानाने अर्जुनाला खांद्यावर घेतले आणि सगळे पुन्हा सार रान तुडवत कच्च्या रस्त्याला लागले. वेगाने गावात भैरोबाच्या देवळाकडे जायला निघाले. देवळापुढे गेले. आप्पाने आणि नानाने अर्जुनाला भैरोबाच्या त्या अंधा-या गाभा-याकडे नेले. भल्या मोठ्या मंदीरामधे काळ्याकुट्ट अंधाराने गच्च भरलेला गाभारा. तीन फुटाच्या दगडी चौकटीचा दरवाजा ओलांडून एक फुट खाली उतरले की गाभा-याची थंडगार फरशी पायाला लागली. सा-या गाभा-यात तेलकट वास सुटला होता. भैरोबाची मूर्ती मंदिरात कुठे आहे ते त्या भयाण अंधारात समजत नव्हत.गाभा-यातल वातावरण ब-यापैकी थंड होत तरी सुध्दा नानाचे कानशील गरम झाले होते.त्याची धडधड वाढली होती. आप्पा आणि नाना दोघही त्या अंधा-या गाभा-यात चाचपडत होते, एकमेकाला धडकत होते आणि त्याच अवस्थेमधे अर्जुनाला संभाळत होते. आप्पाने आपल्या कोपरीतुन कड्याची पेटी काढली आणि पेटवली. त्याच प्रकाशात भैरोबाचा दिवा शोधला. त्यात तेल घातल. जुनी वात पुढे सरकवली आणि पेटवली. अंधा-या गाभा-यात अंधुक प्रकाश झाला. हा मंद प्रकाश मात्र भिती दाटवत होता. ह्या अंधुक प्रकाशात भैरोबाची काळ्या पाषाणातली ऊभी दोन फुटाची मूर्ती दिसत होती. त्याच्या समोर पडलेल्या खोब-यच्या आणि गुळाच्या तुकड्यांवर मुंगळे फिरताना दिसत होते. देवाचे पाय नानाने धुतले आणि त्याच चौथ-यावर अर्जुनाला झोपवला. नाना देवासमोर आता जोरजोराने रडायला लागला. रडतच नाना अर्जुनासाठी जीवदान मागत होता. अर्जुनाचा श्वास चालु होता. आप्पाने नानाला बाहेर पाठवले. पाच मिनिटांमधे आप्पा बाहेर आला.

सगळेजन हात जोडुन कोणी मांडी घालुन तर कोणी दोन पायावर मंदीरामधे बसले होते. अर्जुना गाभा-यात भैरोबाच्या पायाशी विसावला होता. आतमधे फ़क्त काळ्या पाषाणातील भैरोबा आणि काळा पडत चाललेला अर्जुन दिव्याच्या अंधुक प्रकाशात दिसत होते. सर्वजण खाली मान घालुन बसले होते. आप्पा गाभा-याकडे बघत होता. नानाच्या दोन्ही डॊळ्यातुन पाण्याच्या धारा चालु होत्या. बरेच जण मात्र आपली मळ्यातली काम रखडली ह्या विचारात होती. बराच वेळ झाला मंदिरात अजून शांतता होती. सगळ्यांचे लक्ष एका आवाजाने वेधले. फटफटीचा आवाज येत होता. मालक येत असल्याची चाहुल सगळ्यांना लागली. सगळेजण मनातून सावरुन बसले आणि नजर गाभा-याकडे लावली. फटफटीचा आवाज स्प्ष्ट होत गेला आणि तो अगदी जवळ येऊन थांबला. मालकाची फटफटी मंदिरासमोर येऊन थांबली. सगळेजण उभे राहीले. फक्त नाना आणि आप्पा जिथे होते तिथेच बसुन राहिले. मालकाच्या मागेमागे स्वत:चे कपडे सावरत रंगीत पँट शर्ट घातलेला मुकादम गडबडीने पुढे येत होता. दणकट शरीरयष्टीचा, घोळदार पायजमा आणि पांढ-या खादी शर्टामधे रुबाबदार चाल ठेवत इंदलकर एकाहातात छोटी  बॅग आणि गाडीची किल्ली घेऊन मंदीरात आला. गड्यांशी बोलायला लागला. आप्पा आणि नानांनी काही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. मग त्यांना आपल्या विशेष मालकी आणि करड्या आवाजात त्यांना बोलावले आणि म्हणाला, "आप्पा. किती येळ झाला".
आप्पा, "पहाटपासुन हाये बहुदा".
इंदलकर, "मग कस आता?"
आप्पा, "देवालाच माहीत".
इंदलकर, "ओय नानाऽऽ. परश्याची आणि त्याच्या बायकुची मैत करायला लागंल. मुकादम नानाकडे पैस द्या. नाना दोन दिसात वस्तीवरचा सुताक संपवा. लै कामाचा खोळांबा होतुया".
मुकादमाने मालकाच्या हातातली बॅग घेतली आणि त्यातुन पैसे काढून मोजायला लागला.
नाना, "व्हय जी मालक. आता जीव जायचा म्हणल्यावर..."
नानाच बोलणे मधेच तोडत इंदलकर म्हणाला, "समद माहीती हाये नाना. माझं धाकट पोरग काल खेळताना पडलं, त्याला तालुक्याला दवाखान्यात नेलाय. तिकडच असतु मी सारा हप्ता. मला जास्त येळ नाय लक्ष ठिवायला. त्यामुळं सुताक संपवायचं दोन दीसात."
नानासह सगळेजण "व्हय मालक" म्हणाले.
नानाच्या मनात विचार आला, ’पैका असता तर आपन आत्ताच अर्जुनाला दवाखान्यात नेला असता. पण म्या पडलो म्हतारा आणि वस्तीत कुनालाच उल्हास नाय’.

तेवढ्यात इंदलकर पायतल्या वहाणा न काढताच गाभा-यापर्यंत हातातली किल्ली फिरवत गेला. आतमधे डोकावले आणि म्हणाला, "आप्पा देतोय का नाय भैरोबा कौल बघा जरा"
असं म्हणून इंदलकर आणि त्याच्या मागोमाग त्याचा मुकादम निघाला. मुकादमाने जाता-जाता दहाच्या नोटांचे बंडल नानाकडे दिले. सगळेजण मालकाच्या मागे चालायला लागले. नाना सोडून बाकीचे सगळे सालदार मनातून खुष झाले होते. मयतीचा-सुतकाचा पैका मालकाने दिला होता. सगळ्यांच्या मनात आता एकच गोष्ट होती ती म्हणजे त्या पदराची गाठ ज्यामधे परश्याच्या बायकोचे गंठण बांधले होते. गंठण विकून वाटून घेऊ असा विचार सगळ्यांच्याच मनात होता.
इंदलकर गाडी जवळ थांबला. बॅगमधुन कागदात बांधलेला पानाचा विडा काढला. विड्याची अजुन एक घडी करुन पान तोंडात घातले. त्याच कागदावर दोन बोट फिरवून त्याने कागदावरचा जास्तीचा आणलेला चुना उचलला. स्वत:ची जीभ बाहेर काढून तो चुना जीभेच्या दोन्ही कडेला लावला आणि त्या चुन्याचअ आणि विड्याचा तोंडात एक प्रकारचा जाळ करुन इंदलकर सगळ्यांना उद्देशुन बोलायला लागला, "सुताक दोन दिस असलं तरी उद्या रातच्याला चौघं-पाच जण रानात पाण्यावर जा. म्या आता तालुक्याला चाललोय. पोरग हाय माझ तिकड".
बोलत असताना त्याच लक्ष मंदीरातल्या गाभा-याकड गेलं आणि म्हणाला, "आरं कुत्र चाललय बघा आत. हाकला त्याला".
मागच्या मागेच भिका गाभा-याच्या दारात गेला आणि कुत्र्याला हाकलून परत मालकाच्या समोरच्या घोळक्यात परतला. मालक निघाला तेंव्हा भिका नानाला म्हणाला,
"नाना दिवा इझलाय वो आतला. दिसत नाय आतमधी काय बी".
हे ऐकताच नानाच चेहरा जागेवर थिजला. त्याने आप्पाकडे बघितले. आप्पाने स्वत:च्या खिशातली काडेपॆटी नानाला दिली. नानाने हातातले पैसे भिकाकडे दिले. नाना घाई-घाईने गाभा-याकडे गेला. सगळेजण नानाच्या मागेमागे जाऊन गाभा-याच्या बाहेर उभे राहिले. नानाने अंधा-या गाभा-यात प्रवेश केला. काडी पेटवली. दिवा लावला तसा त्या अंधारामधे गंभीर मंद प्रकाश पसरला. काळ्या पाषाणातल्या भैरोबासमोर अर्जुन जसा ठेवला होता तसाच पडला होता. नानाने त्याच्या कपाळावर हात फिरवला. अर्जुन थंड पडला होता. नानाने आशेने त्याचा पाय चोळण्यासाठी ऊचलला आणि त्याच वेळेस नानाच्या हातून अर्जुनाचा पाय गळाला. नानाने पटकन अर्जुनाल दोन्ही हातामधे ऊचलला आणि अचानक एखादा बांध फुटावा तसा नाना देवासमोर मोठ्मोठ्याने रडून अर्जुनाचा काय चुकल विचारत होता. आप्पा नानाकडे काडीपेटी देऊन तसाच मागे फिरला होता. लोक त्याला पाठमोरा  खाली मान घालुन चालताना पहात होते. अर्जुन सुध्दा गेला होता. नाना दोन्ही हातावर अर्जुनाला घेऊन गाभा-याच्या बाहेर आला आणि सगळ्यांकड बघुन म्हणायला लागला,
"अर्जुन गेला रऽऽऽऽ.... कुणी नका संभाळु ह्याला... त्यानी त्याची सोय केलीया... मलाबी नाय संभाळणार त्यो आता..."
सगळेजण मान खाली घालुन बसले होते; पण ह्या वेळेस सगळ्यांच्याच डोळ्यातुन पाणी येत होतं. गाभा-याच्या दारात शेवटी झाला तो अश्रुंचा अभिषेक आणि गेला तो अर्जुनचा बळी.
सापाचा दंश परश्याच्या घरालाच नाही पण सा-या वस्तीच्या गरिबीला झाला
हा प्रसंग म्हणजे त्या वस्तीतल्या प्रत्येक सालदार गड्याच्या आयुष्याला झालेला सर्प्'दंश' होता.

 
(समाप्त)

धन्यवाद,
______मनस्वी राजन

Sunday, July 24, 2011

छोट्या आणि रामा बोकड

छोट्या आणि रामा बोकड

एकेमेकांशी असलेले नातं,प्रेम,ऋणानुबंध यांचा थोडक्यात अर्थ म्हणजे दोन किंवा त्याहून जास्त व्यक्तींची असणारी एकमेकांबद्दल समज,गरज, आस्था आणि अपूर्णता. इतक्या सहज ह्या वस्तुस्थितीची व्याख्या करण तसं खूप अवघड आहे. 
आमच्या गावाला शेजारी राहणा-या शेतकरी कुटुंबामध्ये चार गायी होत्या. चारही गायी अगदी मारक्या, पण वयाची ८० उलटून गेलेले आजोबा त्यांच्या जवळ आले की सगळ्याच्या सगळ्या जणी त्यांना चाटायला सुरवात करायच्या. अजब केमिस्ट्री होती त्यांची आजोबांबरोबर. आजोबा त्यांच्या बरोबर बोलायचे सुध्दा "हं....जास्त लाडात येऊ नकोस. लई तशी नख-याची हायेस तु…" , "मला समद कळतया कशासाठी आरडा-ओरडा चाललाय…थोडासुदिक उशीर झाला चा-याला की झाली चालू तुमची बोंबाबोंब..","मी गेल्यावर बसा तुम्ही ग्यानबा-तुकाराम करत..", "ये गं माझी बाय लाडाची ती" असले वेगळे वेगळे संवाद आजोबांच्या तोंडातून येत आणि असा वाटायचं की सगळ्या गाई ते सगळं ऐकतात सुध्दा.

मध्यंतरी मला एक-दीड वर्ष गावी जाऊन राहावे लागले. येऊन-जाऊन करत होतो पुण्याला पण जास्त मुक्काम गावातच. गाव पुरंदर तालुक्यातल, पुणे जिल्ह्याचचं. गावात बागायती आणि जिरायती अश्या दोन्ही प्रकारची शेती होती. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुध्दा तेवढीच मोठी तफावत होती. श्रीमंत शेतकरी प्रत्येक वर्षी जास्त श्रीमंत आणि गरीब शेतकरी दरवर्षी महागाईमुळे जास्त गरीब. ब-याच गरीब शेतकरी बायका रोजावर (रोजंदारी) गावातल्या शेतक-यांच्या शेतात कामाला जायच्या. पंचवीस रुपये रोज होता तेव्हां त्यांना. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अश्या वेळेत त्यांची कामे चालायची. पहाटे उठून, स्वयंपाक करून, स्वत:च्या शेतातील काम उरकून ९ वाजता 
दुस-याच्या शेतात कामाला रुजू.

आमच्या शेजारी एका पडक्या घरात असेच एक कुटुंब होतं. नाकर्त्या पुरुषांची पुरुषप्रधान संस्कृती सकाळपासून हातभट्टीच्या गुत्त्यावर रिघ लावून बसायची; त्या गर्दीतच त्या काकूंचा नवरा असायचा. काकूंना दोन मुलं. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी मोठी होती आणि मागच्याच वर्षी तीचं लग्न झाले हो्ते आणि मुलगा तालुक्याच्या गावाला बारावीला जात होत."छोट्या" म्हणायचे सगळे त्याला. पोरगं तसं चुणचुणीत, गोरंपान, अगदी लहान शरीरयष्टी, मला तर पहिल्यांदा तो आठवी-नववीचा विद्यार्थी वाटला. मी त्याला माझी सायकल दिली होती पुण्यातून आणून. कारण घरात माझी बढती बाईकवर झाली होती. सायकल चालवतच तो जवळच्या एका गावात आणि तिथून एसटीने तालुक्याला जायचा. त्याच्या गावातून सात किलोमीटरपर्यंत तो सायकल चालवत जायचा. एका बाजूने पूर्ण चढ आणि एका बाजूने उतार. एवढासा जीव कशी काय सायकल तिथपर्यंत चालवत असेल याचं मला नेहमी कौतुक वाटायचं. ह्या दिड वर्षात मी त्याच्या अंगावर कॉलेजात जाताना एकच शर्ट बघितला आणि एकच प्यांट. पायात पांढरी-निळी स्लीपर, केसांचा कोंबडा करायची हौस होती त्याला. एकटा घरी असला की आरश्यासमोर उड्या मारून आपले केस हवेत उडतात का ते पहायचा आणि सारखा कंगवा हातात ठेवायचा. दिड वर्ष एकच ड्रेस कॉलेजसाठी? खरंतर अश्या विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्मच बरा. असो...

त्याची आई बिचारी जबरदस्त कष्टाळू बाई. दिवसभर कष्ट ते सुद्धा अक्षरशः गुरासारखे. तिचा दिवस मात्र खूप जास्त भयानक अवस्थेमध्ये संपायचा. रात्री नवरा दारू पिऊन यायचा आणि मग छोट्याची आणि त्याच्या आईची बराच वेळ रडा-रडी सुरु व्हायची, नवरा शिव्या देत राहायचा आणि दारूच्या नशेत मारहाण सुध्दा करायचा. ठराविक वेळेत हा गोंधळ नाही थांबला की शेजारच्या म्हाता-या बायका यायच्या, मध्यस्थी करायच्या आणि सगळा गोंधळ थांबवायच्या. बाहेर येताना एखादी 
म्हातारीतरी म्हणायचीच "काय पोरीने पाप केलया म्हणून तिच्या नशिबी असला राक्षस नवरा दिलाय देवानं" असाच एका रात्री खूप गोंधळ चालू होता. नवरा बेदम मारहाण करत होता तिला. मला वाटल मी जाऊन मध्यस्थी केली पाहिजे. छोट्या मोठमोठ्याने ओरडत होता. काळजाचा अगदी थरकाप उडाला. हातातील पुस्तक खाली ठेवले आणि चप्पल घालून तडक त्यांच्या घराकडे निघालो; लगेच वाटेत शेजारी राहणारा चंदू शेठ आडवा आला; त्याने मला त्या घरात जाऊ दिलं नाही. "जाऊ नका तिथे नाहीतर अजून गोंधळ होईल" असे सांगितले. चंदूशेठच स्वत:चं सरकारी स्वस्त धान्य दुकान होतं. त्याने मला सांगितलं "मी बी असाच एकदा तडा-तडा घरात गेलो आणि छोट्याच्या बापाला घरातून बाहेर आणला. मला वाटला झाल आता समदं बैजवार (व्यवस्थित). पण कशाचं काय राव, मी तिथून जाताच त्या बाबाने जे काय त्या बाईला झोडली की ईचारू नका. तो म्हणायचा तुझं आणि त्या चंद्याशेठच काहीतरी लफडं हाये. म्हणूनच घरात घुसला माझ्या. बाऽ बाऽ बाऽऽ तव्हापासून कानाला खडा…आपल्या समजुतीमुळे त्या माउलीचा जीव जायचा. जावा,पडा निवांत घरात.तुम्ही तर पाव्हण्यासारखं आहात गावात..कशाला बरामत घेता अंगावर".
मी हे ऐकून अक्षरश: गोठूनच गेलो. आणि मला हे सुद्धा कळालं फक्त बायकाच का जातात ह्यांच्या घरात हा गोंधळ मिटवायला. रोज जवळ-जवळ असाच शेवट व्हायचा दिवसाचा. पहाटे ४ वाजता छोट्याची आई अंघोळ करून औदुंबराच्या (उंबर) झाडाला पाणी घालताना दिसायची ते ही अगदी वेगात. तिची सगळीच काम खूप वेगामध्ये तशीच तिची भक्तीसुद्धा. तासाच्या आत छोट्याचा डब्बा आणि नव-याची दिवसभर गिळायची व्यवस्था करून डोक्यावर घमेलं, खुरपं, विळा कधी कधी हातात फावडे, कुदळ घेऊन बाई तरा-तरा साडी आवरत स्वता:च्या मळ्यात निघायची. जाताना बाहेरूनच छोट्याला आवाज द्यायची. "बाळाऽऽऽ उठ लवकर. आज उशीर केला ना कालेजला तर कंबरेत लाथ घालील बघ". अजून एक वाक्य यायचं ते म्हणजे "हरणीला बाहेर उन्हाला बांध थोड्या येळान".

"हरणी" हा काय प्रकार आहे हे मला पहिल्या दिवशी कळालंच नाही. त्यांच्या दारात काही गोठा सुध्दा नव्हता की एखादी गाय आहे आणि तीच नाव हरणी असेल. पण ७:३०च्या आसपास छोट्या एक शेळी घेऊन घरातून बाहेर पडायचा आणि त्या शेळीला उन्हामध्ये बांधायचा. लवकर कॉलेजला जायचं असेल तर छोट्या त्या शेळीला "बाय बाय हरणी …!" म्हणायचा आणि स्टाईलमध्ये फ्लायिंग किस सोडायचा. तेव्हां मला कळाले की त्यांनी पाळलेल्या शेळीचे नाव ’हरणी’ आहे. काळ्या रंगाची हरणी आणि तीचे तोंड मात्र संपूर्ण पांढरशुभ्र. जास्त केसही तिच्या अंगावर नसायचे. बरच वयं होत बहुतेक हरणीचे. अगदी तुळतुळीत शेळी मी पहिल्यांदा पहिली आणि ती ही अगदी स्वच्छ. संध्याकाळी कुत्र्या आणि लांडग्यांच्या भीतीने छोट्याची आई हरणीला घरात बांधायची. हरणीचे दूधच ते घरात चहासाठी वापरत. हरणी वर्षातून एकदा यायची म्हणजे तिला पिल्ले व्हायची. विशेष म्हणजे तिला नेहमी तीन पिल्लं व्हायची. शेळीच्या पिल्लाला करढू म्हणतात. नर करढू असेल तर बोकड आणि मादी करढू असेल तर पाठ. अशी ह्यांची नावाने विभागणी होत असते. हरणीला नेहमी तीन करढे होयची. तीन करढे नेहमी व्हायची म्हणून हरणी त्या परिसरात प्रसिध्द होती.

काही दिवसांनंतर हरणीला तीन करढे झाली. २ पाठी आणि एक बोकड. काय झाले कोणास ठाऊक पण २० दिवसात दोन्ही पाठी मेल्या आणि राहिला जिवंत तो फक्त बोकड. हरणीमधे काही तरी जबरदस्त बदल आला. ती तिच्या पिल्लाला म्हणजे बोकडाला अजिबात जवळ करत नसे आणि त्याला दूध सुध्दा पिऊ देत नसे त्यामुळे बोकड उपाशी राहायचं आणि सकाळी लहान बोकड ओरडत बसायचं. महिन्याचं होऊन गेला तरी बोकड ७ दिवसाच्या पिल्लासारखं दिसायचं. छोट्याची आई लहान मुलाच्या दूधाच्या बाटलीमधे दूध काढून घेत असे आणि त्या बाटलीने छोट्या रोज सकाळी घराच्या बाहेर त्या पिल्लाला दूध पाजत असे. ते पिल्लू सुध्दा आईला ढूसण्या मारून दूध प्यावं तस बाटलीमधून दूध पीत असे. छोट्याच्या आईने त्या बोकडाचे नाव "रामा" असे ठेवलं. मग काय; तिथून पुढे सकाळी-सकाळी जोपर्यंत छोट्या उठत नाही तोपर्यंत रामा कायम काकूंच्या मागे-मागे फिरायचा. काकू सुध्दा त्याच्या बरोबर बोलायच्या रामा ब्यांऽऽऽ ब्यांऽऽऽ करत त्याच्यांशी गप्पा मारायच्या. छोट्या उठला की लगेच त्याचा एका जुना शर्ट रामाला गुंडाळायाचा. मग सगळीकडे रामा आणि छोट्याची जोडी इकडे-तिकडे उड्या मारत फिरायची. रोज थोडी गव्हाची कणिक छोट्याची आई ठेवायची, त्याच्या गोळ्या करून छोट्या रामाला खायला घालायचा. शेतावर काकू कामाला जाताना हरणीला हातात आणि रामाला टोपलीत ठेऊन ती टोपली डोक्यावर घेऊन शेतावर जायच्या. छोट्या कॉलेजवरून येता येताच जिथे कुठे त्याची आई कामाला आहे तिथे जायचा आणि रामाबरोबर खेळतखेळत घरी यायचा. रामा मोठा होत होता पण थोडा अशक्तच; त्यामुळे त्याला बोकडाचा वान नव्हता. रंगाने तांबडा अगदी तुळतुळीत. बारीकसं तोंड आणि जागेवर कायम उड्या मारत राहणे, छोट्या कुठूनही नजरेत दिसला की लगेच ओरडायला सुरवात आणि त्याच्याकडे पळत जायचा, छोट्याही त्याच्याकडे बघत बघत रामा सारखाच उड्या मारत त्याच्यापर्यंत यायचा. रामा हरणाच्या पिल्लासारखा दिसायचा.शेजा-यापाजा-यांमधे रामा बोकड आणि छोट्याची मैत्री चर्चेत होती. रात्री झोपताना सुध्दा छोट्या त्याला स्वत:च्या गोधडीमधे धरून ठेवायचा. छोट्याला कधी त्याच्या मुताची घाण आली नाही की त्याच्या लेंड्यांची किळस वाटली नाही. जिथे-जिथे छोट्या जाईल तिथे त्याच्या मागे-मागे रामा असणारच. नंतर काही दिवसातच छोट्याने रामाला बुक्का लावायला सुरवात केली त्याच्या गळ्यात गंडे घालायचा. स्वत:च्या अंग्ठ्यामध्ये काळा दोरा घेऊन रामासाठी जाड असा गोफ बनवला होता. घुंगरू होते. माझ्या आयुष्यात मी कधी बोकड किंवा शेळ्यांचे कधी परिक्षण केले नाही कारण कधी त्यांच्यात विशेष असे काही वाटले नाही. पण रामाची बात काही औरच होती आणि त्याच्या जोडीदाराची सुध्दा. शेजारी-पाजारी सुध्दा रामाकडे पाहून अगदी नेहमीप्रमाणे बोलायचे "कसं वेगळंच करढू आहे" सगळे म्हणायचे."वान कसा हरणासारखा आहे आणि नेमका त्याच्या आईचे नाव सुध्दा हरणी आहे. हाय का नाय योगायोग". छोट्या त्याची साफ-सफाई करायचा खूप स्वच्छ आणि खूप चकचकित असायचा रामा.

एक दिवस हरणीने व्यवस्थित दूध दिले नाही म्हणून छोट्याने जास्त प्रमाणात कणिक खायला घातली. रात्रीपासून रामा थोडा नरमला होता. जास्त उड्या मारत नव्हता, नंतर त्याला जुलाब चालू झाले होते (तिथल्या ग्रामीण भाषेत ढंढाळी लागणे). पार अर्धजीव झाला होता रामा. छोट्याचा जीव सकाळ होईपर्यंत कासावीस झाला. रात्रभर छोट्या काही झोपायला तयार नाही. त्याच्या आईने सांगितले "सकाळी डेअरीवर जाऊन डॉक्टर घेऊन येऊ,आता झोप.काही नाही होत. ढंढाळी लागत असते शेळ्या-करढाना". गावातले शेतकरी सकाळी गावातल्या चावढीपाशी दूध घेऊन यायचे. तिथे सगळं दूध जिल्हा दूध संघामार्फत गोळा केले जायचे. मोठी उलाढाल होती ह्या धंद्याची. तिथे बरेचशे शेतकरी चांगल्या शेतक-यांना सल्ले विचारात असे,"काय पेरलं पाहिजे","कोणत औषध मारलं पाहिजे","बाजरीचा कोणत वान घेतला पाहिजे", असे बरेच काही. मी सुध्दा रोज सकाळी पेपर आणायला जायचो. तिथेच आजूबाजूच्या गावाचे व्हेटरनरी (veterinary) डॉक्टर्स बसलेले असतात. ज्यांच्या गुरा-ढोरांना, प्राण्यांना काही प्रोब्लेम असेल तर शेतकरी त्या डॉक्टर्सना आपला पत्ता देतात आणि मग डेअरीची वेळ संपल्यावर ते डॉक्टर्स सर्व जमलेल्या पत्त्यांवर जातात. 
छोट्या एका डॉक्टरकडे गेला आणि त्याला सांगितलं "आमच्या बोकडाला ढंढाळी लागली आहे, तुम्ही त्याला बघा". 
डॉक्टर उलट त्यालाच म्हणाले" अरे बोकाडच ते.;काही खाल्ल असल होईले ठीक". 
बोकडासारख्या छोट्या प्राण्याकडे डॉक्टरला पाहायला वेळ नव्हता. दुस-या डॉक्टरकडे जाऊन छोट्या अगदी रडव्या स्वरात सांगत होता "चलाना आमच्या घरी". 
त्या डॉक्टरने सुध्दा त्याला झिडकारलं होतं. मग छोट्याच्या शेजारच्या एका माणसाने डॉक्टरला सांगितलं "आहो माझ्या गाईला बघायला येताय तर मग तुम्ही तवा घ्याकी बोकडालाबी बघून. लई जीव हाय पोराचा त्याच्यावर आणि बोकाड सुध्दा अस हाय ना.! की बास. असलं जीतराफ (शेतक-याचे पाळीव प्राणी)  तुम्ही सुध्दा कधी बघितला नसल". 
डॉक्टरने छोट्याला सांगितलं "टाकतो चक्कर.तु हो पुढे. मी येतो तासभरात".
तो डॉक्टर छोट्याच्या घरी आला, तेव्हा छोट्या चुलीसमोर रामाला मांडीवर घेऊन बसला होता. डॉक्टरने बोकडाला पहिला आणि एक भली मोठी गोळी त्याच्या तोंडात घातली अन म्हणाले "होईल बरा संध्याकाळपर्यंत". 
छोट्याने लगेच बोलायाला सुरवात केली,"एवढी मोठी गोळी कशाला घातली तोंडात त्याच्या. तुकडे करून पिठातून दिली असती मी त्याला.आधीच त्याच्या पोटात गडबड आहे, त्यात एवढी मोठी गोळी".
डॉक्टर म्हणाले, "कणिक ह्याच्या तब्बेतीला चांगली; पण जास्त घालू नका खायला, पचवायला जड जातंय त्याला ".
"लगेच बरा होईलना आता तो, सकाळ पासून आवाजसुध्दा नाही काढला बाहेर त्याने, खेळतपण नाही". छोट्या रडवेला झाला होता.
डॉक्टरला सुध्दा हे प्रकरण थोडं वेगळं वाटले. 
डॉक्टर- "वयाच्या मानाने तुमचा बोकड बराच लहान आहे. ठेवण्यापेक्षा देऊन टाका खाटकाला; असाही आखाड चालू झाला आहे". 
छोट्या लगेच ताडकन उठला आणि रामाला जाऊन पकडलं "आम्ही नाही विकणार रामाला खाटकाला. आईगं आपण नाहीना विकणार रामाला?".
छोट्याचे वडिल-"त्याला ठेऊन काय गावावर सोडायचा का उडवायला". 
छोट्याला काही अर्थ कळला नाही त्याचा "मी नाही विकू देणार त्याला" 
अस म्हणत त्याने रामाला उचलला… रामाने सुध्दा त्याच्या छातीवर मान टाकली. ती सुध्दा अगदी प्रेमाने. छोट्या रडायला लागला होता..
छोट्याची आई-"किती झाले डॉक्टर साहेब तुमचे? आमच्या पोराला लागलय त्या बोकडाच याड".
 डॉक्टर-"माझे काहीनाही झाले. नको मला पैसे. पहिल्यांदाच बघतोय बोकाडावरच प्रेम. कुत्र्या मांजरावर सुध्दा एवढ आजकाल कोण जीव टाकत नाय. तुमच्या रामा आणि छोट्यासाठी माझ्याकडून पैसे माफ" असे म्हणून डॉक्टरने आपल्या एम८० ला  किक मारली आणि निघून गेले.

रामा आता परत उड्या मारायला लागला. छोट्या सकाळी त्याच्या बरोबरच कसला तरी पाठांतर करत होता. बहुतेक परीक्षा होती त्याची कसलीतरी. दारासमोर वही घेऊन येरझ-या घालत छोट्या वाचायचा आणि रामा त्याच्या मागे-मागे येरझ-या घालायचा. छोट्याच्या घरात ब-यापैकी अंधार असायचा आणि रात्र झाल्याशिवाय दिवा लावायचा नाही, हा त्याच्या आईचा नियम होता. घरात फक्त एक बल्ब आणि एक जुना टेबलफॅन तो सुध्दा छोट्याच्या वडिलांसाठी. तरीसुध्दा विजेचा वापर बिलाचा विचार करून कमीच. त्यामुळे छोट्या दारासमोरच अभ्यास करायचा आणि त्याच्या मागे-मागे रामा, जवळच्या रस्त्याने जाणा-या एका मुलांच्या घोळक्याने छोट्याला आवाज दिला आणि रामाला त्याच्या बरोबर पाहून सगळे म्हणायला लागले."छोट्या माकड आणि रामा बोकड","छोट्या माकड आणि रामा बोकड","हय..छोट्या माकड आणि रामा बोकड". छोट्या त्यांना सगळ्यांना जोरात "हाड हाड" म्हणाला आणि आपल लक्ष परत रामावर आणि अभ्यासात घातलं.

एक दिवस सकाळी-सकाळी एक भला मोठा काळाकुट्ट माणूस छोट्याच्या घरी आला होता. छोट्याच्या वडिलांनी त्याला बोलावलं होते. पायजमा, लाल भडक रंगाचा शर्ट, हाताच्या बोटांमध्ये जाड-जाड अंगठ्या. राजदूत गाडीवर फट-फट करत आमच्या घरासमोर गाडी लावली. माझ्याकडे बघत तोंडातली तंबाखू आमच्याच घराच्या भिंतीवर टाकली. दिसायला अगदी फिल्मी खलनायकासारखाच. त्याचा एक डोळा सुध्दा बारीक होता. बहुतेक तो कामातून गेलेला असावा. लांब पण पातळ केस, मागे सरकवलेले आणि पायात त्याच्या वजनाला शोभतील अश्या वजनी वहाणा. जोरात छोट्याच्या वडिलांना आवाज दिला. वडिल बाहेर आले. छोट्याची आई आली. छोट्या आपल्या फाटक्या बनियन आणि जुन्या शाळेच्या खाकी चडडीवर बाहेर आला. छोट्याच्या वडिलांनी नमस्कार केला आणि छोट्याच्या आईला सांगितलं की आलेली व्यक्ती ही खूप मोठा खाटिक आहे. नाव त्याच संपतराव होतं. छोट्याच्या आईला आपल्या नव-याने खाटकाला घरी कशाला बोलावलं ते लगेच कळालं. रामाला विकायचा बेत होता. तिने तिथेच सुरवात केली, "हे बघा जे काही पैसे येतील ते मला पाहिजेत. मला झेंडूची रोप आणायची हायेत शेतात लावायला".
छोट्याचे वडिल "हा हा मला माहिती हाये. त्यासाठीच बोलावलं हाये मी ह्यांना."
खाटिक- "कुठाय बोकाड, बघू जरा". 
छोट्याला हा काय प्रकार चालला होता ते कळत नव्हतं. तो हरणीला पिठाचा चाळ खायला घालत होता. त्याच्या मागेच रामा होता. छोट्याच्या आईने पटकन येऊन रामाला उचल आणि खाटकासमोर ठेवला. लगेच छोट्या खाटकापर्यंत गेला. खाटिक खाली वाकला आणि रामाच्या मानेच्या थोडे मागे आणि पाठीच्या थोडासा पुढे एक हाताने जोरात दाबलं. रामाने मोठा भयंकर आवाज काढला. रामा तडफड करायला लागला. छोट्याला काय ते पाहवलं नाही "ओऽऽऽऽऽ.. सोडा त्यालाऽऽऽऽ".
त्या खाटकाला रामा सारखीच छोट्याने ढुसनी दिली आणि रामाची सुटका केली.रामा जोरात पळत-पळत हरणीच्या तिथे गेला. त्याचा भयानक आवाज ऐकून हरणी ओरडायला लागली होती. खाटकाला छोट्याचा राग आला. पडला असता तो जोरात. पण सावरला 
संपतराव- "मांद नाय हो बोकडात तुमच्या. किती द्यायचे तुम्ही सांगा. ४-५ महिन्याचा म्हणताय तुम्ही पण बोकडात काय दम नाय. अजिबातच मांद नाय. भरलंच नाय ते" (मांद म्हणजे एकंदरीत प्राण्याच्या अंगात असणारे मांस)
छोट्या- "नसुद्या मांद, आम्हाला नाय विकायचा रामाला"
छोट्याचे वडिल- "थोबाड फोडू का तुझं. लै तोंड चालवतोय"
छोट्या जोरजोरात रडू लागला "आई नकोना गं विकू रामाला. हरणी परत याली की ती करढ विक वाटल्यास. रामाला नकोना विकू"
छोट्याच्या आईला छोट्याच्या रडणं आणि अवस्था बिकट वाटली आणि तिला सुध्दा खूप वाईट वाटलं. तोंड पदराने झाकलं आणि हुंदका देताच म्हणाली "तुझ्या बापालाच सांग काय ते. मला तर काय कळाना आता".
एवढेच म्हणून ती घरात गेली. छोट्याच रडणं चालूच होतं. छोट्याच्या वडिलांनी संपतरावशी बोलायला सुरवात केली.
"संपतराव नका लक्ष देऊ त्या  ****कडे. बावळट हाये ****चा. तुम्ही जावा घेऊन बोकाड. सांगा किती होत्यात ते"
खाटिक- "नको मला तुमचं बोकाड. आसं हे जीव असल्याल जीतराफ आम्ही विकत घेत नाय. पोराचा जीव हाये तुमच्या बोकडावर. नको. जीव गुतल्यालं जीतराफ नको मला. लाभत नाय असलं आम्हाला". असं म्हणून त्याने आपली राजदूत चालू केली आणि निघून गेला. छोट्याच्या वडिलांना छोट्याचा फार राग आला होता. 
"घरात चल. साल्टच (चामडी) काढतो तुझं" असे म्हणत, तन-तन करत घरात निघून गेला. छोट्याने मात्र आपला रडणं थांबवलं आणि अगदी खुशीत रामाला जवळ घेऊन बोलायला लागला "नाय विकणार तुला कुणीच. आता नाय विकणार तुला कुणीच" रामा सुध्दा त्याच्या बरोबर उड्या मारायला लागला. हे दृश्य पाहून मला सुध्दा खूपच आनंद झाला. रामा आणि छोट्या खरच खूप खुष होते आणि मला ते माझ्या डोळ्याने दिसत होत. खरंच, सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्या भावना असतात. आपण फक्त त्या बघत नाही किंवा ओळखत नाही. छोट्याला येवढा खुश पाहुन रामा सु्ध्दा डोळे विस्फारून छोट्याकडे बघत आनंदाने जागेवरच उड्या मारत होता. प्राणी कोणताही असुदेत त्याच्या भावना समजून घेणं, त्या ओळखणं आणि त्या स्वत: अनुभवनं म्हणजे जबरदस्त अनुभव असतो आणि त्याची मला अनुभूत्ती सुध्दा आली होती.

२-३ महिने झाले होते. छोट्याला परीक्षेमुळे तालुक्याच्या गावात होस्टेलवरच राहायचं होतं. ३-४ महिने छोट्या शनिवारचा घरी यायचा. रामा मोठा झाला होता. पण तो बोकडाचा वान काय अजून आला नव्हता. आता मात्र छोट्याच्या आईने चंगच बांधला होता. रामाला विकायाचाच. छोट्याला एक दिवस बाहेर बसून सांगत होती.
"आता येत्या शनवारी रामाला विकणार हाये".
छोट्याने खूप आरडाओरडा सुरु केला.
"अरे आपली हरणी परत घाबण हाये. होत्यालाच की तिला करढं".
छोट्या-"मग ती करढं विकून टाक".
छोट्याची आई- "आता पैसे लागायचे हाइत घरात. तुझ्या हट्टापायी झेंडू सुध्दा लावता आला नाही. आता गरज हाय पैश्याची. तुझे काय दात पाडून आणायचे का पैसे". छोट्याची आई आता वैतागाच्या स्वरात बोलत होती. 
छोट्या रागाने," नाय विकायचा रामाला." 
दन-दन पाय आपटत छोट्या रामाकडे निघाला. सोमवारी छोट्या आईला सारखासारखा सांगत होता 
"आई रामाला विकू नको बर का".
 आई नाही नाही म्हणत त्याला एसटी स्टँडवर छोट्याला सोडून आली. घराकडे येता-येता मुसलमानाच्या घरात खाटकाला उद्या सकाळीच घरी पाठवायचा निरोप देऊन आली.

दुस-या दिवशी शेजारची जनाकाकू आणि छोट्याची आई खाटकाची वाट बघत बसल्या होत्या. जनाकाकू नावाची आज्जी म्हणजे छोट्याच्या आईचा मोठा मानसिक आधार. छोट्याची आईने रामाचा दोर हातात धरला होता आणि दोन पायावर बसली होती. डोळ्यात चांगलच पाणी तरारलं होतं. जनाकाकू तिच्याशी बोलत होती.
"आग पोरी, शेतकऱ्याच्या आयुष्यात जीतराफच असत्यात. असा शेळा-करढावर जीव लावला तर कस जगता येईल. बोकाड मोठ झालय आता. उडाया बघतय सगळीकड. यवढच वाटतंय तर थांब अजून थोड दिस. तुझी हरणी हायेच घाबण, तिला होतील करढ. मग हे बोकाड इकून टाक." 
छोट्याची आई "तस नाय वो जनाकाकू. मागच्या आठवड्यात पोरीचा फोन आला व्हता शेजारी. ती सुध्दा गरवार (pregnant) हाये. सातवा महिना संपलाय आता. आता पाव्हनं म्हणत्यात की बाळंतपणाला माहेरी जा म्हणून. आता पोरीचा बाळंतपण जरी सरकारी दवाखान्यात केलं तरी खर्च येणारच की वो. कुठून आणू पैसा".
तिच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहत होते."मी काय आज करते होय शेळ्या करढाचं पण ह्या पोरामूळं बोकडात जीव अडकला माझा पण. त्याला जर कळालं तर पोरगा अभ्यास पण नाय करायच. रडून-रडून नको करल. लै तरास करून घेता स्वत:ला बोकडासाठी".
जनाकाकू- "कोनाला कशाची माया लागल सांगता येत नाही पोरी. चांगला जीव लावला बोकडाला. तुझ्या पोरीच्या पोराबाळासाठीच कामाला आला शेवटी. ह्यच बघ कसा देव पण करतो. तुझ्या पोरीच्या बाळंतपणासाठी तुझ्या हरनीच बाळंतपण कामाला आलं. आई अंबाबाई सगळ बघतीया पोरी. उग रडू नगस. काढू आपण छोट्याची समजूत".
छोट्याची आईने रामाचा दोर जनाकाकूंकडे दिला आणि म्हणाली, "देऊन टाका खाटकाला. मी जाते मागच्या रानात. मला नाय बघवायाचं रामाला आता" .
डोळे पुसत पुसत छोट्याची आई रामा कडे गेली, बारक्या पोराला गोंजाराव तसा रामाला गोंजारलं, त्याला पाणी दिलं. हातातला कणकेचा गोळा दिला आणि तरातरा हरणीला घेऊन निघून गेली.
राम तिच्या कडे बघून ओरडत होता. आज त्याला रानामध्ये चालवलं नव्हतं. जनाकाकूच्या मागून हे दृश्य मी पहात होतो. जनाकाकूचे डोळे सुध्दा पाण्याने भरून आले.
औदुंबराच्या झाडाकडे बघत जनाकाकू म्हणाली, "देवा कसा रं जीव अडकवला तू. तुझी पाटी तुलाच माहिती. लक्ष ठेवरे बाबा".

काही दिवसांनी माझ्या घरी फोन आला. छोट्याच बोलत होता. त्याच्या आईला मी बोलावून घेतलं. छोट्या आईला मोठ्याने विचारात होता, "आईऽऽऽ..हरणी ला काय झालं...? आणि ताईला मुलगा झाला की मुलगी?"

Sunday, July 3, 2011

सुरुवात...


सुरुवात... मनापासुन... मनापर्यंत..

"व्यासंग" या शब्दाचा अर्थ मला कधी जास्त कळलाच नाही. अर्थ डोक्यात घुसला तो जेंव्हा मी पु.लं. चा "सखाराम गटणे" वाचला आणि पु.लं. च्या सादरीकरणातून ऐकला. व्यासंग, छंद, नाद (खुळा), वेड ,आवड, हौस आणि इंग्रजी मधली हॉबी हे सगळे एकच. फरक फक्त एवढाच की, व्यासंग चांगला कींवा वाईट असतो. व्यासंगाच व्यसन सुद्धा लागतं. सगळ्यांच्या माहितीप्रमाणे व्यसन कधी चांगल्या गोष्टीचं आणि कधी वाईट गोष्टीच असतं. असो..!

एवढी मोठी प्रस्तावना द्यायचं कारण असं की मला सुद्धा बरेच व्यासंग आहेत. व्यसनच म्हणु आपण त्याला. "व्यसन" हा शब्द वापरायला आणि समजायला बरा असतो. चटकन लक्षात येतो. अशा व्यसनांची म्हणजे व्यासंगाची बरीच मोठी यादी आहे माझ्याकडे. सांगायचं म्हटलं तर मला सिगरेट प्यायला आवडते (३ वर्षे झाली या व्यसनाशी फारकत घेतली आहे). मला कॅसीओ वर बोटे फिरवत बसायला आवडते... येत काही नाही मला कॅसीओ मधलं पण हे व्यसन जपायची इच्छा आहे. भिमसेन जोशी आणि कुमार गंधर्व यांना ऎकायचं व्यसन सध्या माझं जोरात चाललयं. वाचन हे माझ जुनं व्यसन, अगदी लहानपणी मिळणा-या "चंपक","ठकठक" आणि "चांदोबा" सारख्या मासिकांपासुन मी हे टीकवून ठेवलय. इंग्रजी साहीत्य वाचायची हिंमत मात्र कधी केली नाही. कारण मला डीक्शनरी घेऊन बसायला लागत. हे सगळे आमच्या मराठी शाळेचे संस्कार. पण मागच्या आठवड्यात "Memmories of Midnights" नावाचं Sidney Sheldon चं नोव्हेल वाचलं. विशेष म्हणजे मला समजले सुध्दा. अगदी हलवुनच टाकलं या पुस्तकाने. या पुस्तकाच्या प्रत्येक तीन पानांमधे हिंदीचा तीन तासाचा सिनेमा बनू शकतो. अतिशय काल्पनिक पण सगळं कसं खरं-खरं वाटतं.. असंच अजुन एक व्यसन म्हणजे "लिखाण" करणे. कविता काय असते जेंव्हा मला लहानपणी कळालं तेंव्हाच कविता केल्या. पहिल्या ऒळीचा शेवटचा शब्द आणि दुस-या ओळीचा शेवटचा शब्दोच्चार जुळला पाहिजे म्हणजे कविता होते, त्याला "यमक" असे म्हणतात. एक सुध्दा कविता मला तुम्हाला संदर्भासाठी देऊ वाटत नाही. एवढा तो बालिश चाळा होता. खुप दिवस वाटतं होत की मला कविता चांगल्या करता येतील, पण जेंव्हा "कवी ग्रेस" यांच्या कविता वाचल्या ( वाचण्याचा प्रयत्न केला ) तेंव्हा कविता करण्याची हिंमतच उडून गेली. माझे सर्वात favorite "सुरेश भट" वाचले, ऐकले, समजलो तेव्हा मला माझी लायकीच कळली. एवढी आर्तता मला ७० जन्म घेतली तरी येणार नाही.

रोजची डायरी लिहिली.. दैनंदिनी.. बरिचं वर्षे लिहिली. शाळा, कॉलेज, क्लास, ग्रुपसाठी काही छोट्या-छोट्या नाटिका लिहील्या. तिथल्या तिथे सादरीकरणासाठी ब-या होत्या. ज्याची बॅट त्यालाच पहिली बॅटींग या नियमाप्रमाणे या नाटकांमधे सगळी प्रमुख कामं माझीच असायची आणि सगळे सहन सुद्धा करायचे.

२००६ मधे कामानिमित्त फिरावं लागायचं. २००६ च्या अगोदर Marketing च्या कामानिमित्त ब-याच लोकांशी संवाद साधावा लागायचा. ह्या सगळ्या पसा-यामधे मला रोजच्या आयुष्यात घडणा-या अनुभवांची गोष्ट करुन , रंगवून सांगायची सवय लागली. कोणी तरी म्हणाले छान सांगतो आता हे लिहायला सुरवात कर. मग काही अनुभव/प्रसंग लिहिले देखील. Internet वर ओळखीच्या लोकांना वाचायला दिले. प्रत्येकाल आवडले सुध्दा. कुणी सुधारणाही सांगितल्या (व्याकरणाच्या सुधारणेकडे मी काना-डोळा केला).

२००६ पासुन Software इंडस्ट्रीमधे अक्षरश: घाम घाळतोय. हे सगळे लिखाणाचे छंद मागे पडले. सकाळपासून दुस-या दिवसाच्या सकाळ पर्यंत कधी-कधी काम करायचं, त्यामुळे ह्या सगळ्या व्यासंगाला खीळ बसली. आता सध्या वेळ मिळतॊय, म्हटलं करु सुरवात, ती सुद्धा ब्लॉगवरुन.. जास्तीत जास्त लोकांना वाचायला सांगायचं... प्रतिक्रिया घ्यायच्या.. सुधारणा जमत असल्या तर करायच्या.. यातून नक्की काय साध्य करायचं हे माहित नाही. पण व्यसन चांगलं आहे, करत रहायचं.. आपण Observe केलेले अनुभव आपल्या शब्दात सांगायचे.. लोकांपर्यत पोहचवायचे.. बघू लोक काय म्हणतात ते.. वाचत रहा आणि मला शिकवत रहा....

अनुभव... क्षण वेचलेले...

मनस्वी राजन